ठाणे : पारसिक डोंगरावरील वन विभाग व रेल्वे विभागाच्या अखत्यारीतील पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन, मध्य रेल्वे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत ठाणे महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.
वन विभाग व रेल्वे विभागाच्या अखत्यारीतील पारसिक डोंगरावरील पारसिक बोगद्यावर अतिक्रमण करून रहिवास व वाणिज्य वापर करण्यात येत आहे. या परिसरातील रहिवाशांकडून वर्षानुवर्षे सांडपाण्याचा निचरा डोंगर भागात होत असून, हा भाग डोंगर उताराच्या लगत असल्याने पावसाळ्यात डोंगर उताराचा भाग कोसळून वा भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पारसिक बोगद्यामधून रेल्वेगाड्यांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, या दृष्टिकोनातून कृती आराखडा तयार करून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.
यामध्ये पारसिक बोगद्यावरील अतिक्रमणधारकांची यादी तयार करणे, या जागेचा भोगवटा ७२ तासांच्या आत रिक्त करण्यापकरीता त्वरित पोलिस बंदोबस्तात नोटीस बजावणे, या परिसरातील बाधित होणाऱ्या पात्र अतिक्रमणधारकांची यादी तयार करून पुनर्वसन धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन करणे, इत्यादी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. दरम्यान नोटीस कालावधी संपल्यानंतरही अतिक्रमणधारकांनी भोगवटा रिक्त न केल्यास सर्व विभागांमार्फत संयुक्तपणे कारवाई करण्यात येईल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्रकुमार गोयल, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) डॉ. डी. एस. स्वामी, द्वारकाप्रसाद पटेल, वन विभागाचे जितेंद्र रामगावकर, दिलीप देशमुख, तहसीलदार के. के. भदाणे, नगर अभियंता रतन अवसरमोल, उपआयुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्लेश, कार्यकारी अभियंता (विद्युत) विनोद गुप्ता आदी अधिकारी उपस्थित होते.